कंपनीतील सहकाऱ्याने २ दिवस आधी पणजी शहरामध्ये हॉटेलची रूम बुक करून ठेवली होती . सिझन नसल्यामुळे बीचजवळ हॉटेल सहज आणि कमी दरात मिळाले असते पण मुद्दाम पणजी शहरात राहण्याची व्यवस्था केली होती कारण आम्हांला बाईकवरून प्रवास करता यावा तसेच चर्च,मंदिर पाहण्यासाठी फिरता यावे. हॉटेलवर पोहचून आम्ही चारही जणांनी सुस्त ताणून दिली, २ तास आराम केला आणि नाश्ता चहा घेऊन तयार झालो आणि गोवा दर्शन करण्यासाठी बाहेर पडलो हॉटेलमधील एकाने दोन दुचाकीची सोय केली होती एक होंडा एक्टीवा आणि दुसरी सी डी १०० त्यावर चार जणांचा प्रवास सुरु झाला. पणजी ते बीचवर पोहचेपर्यंत प्रत्येक दहा कि मी पर्यंत प्रत्येकी एक बिअर संपवायचीच असा आम्ही जणू काही पणच केला होता, आमच्यातला एक जण न पिणारा होता त्यामुळे त्याच्या वतीने पिण्याची जबाबदारी आम्ही तिघेच पार पाडणार होतो. आणि ठरल्यापेक्षा जास्त बिअरप्राशन सुरु झाले. पहिला कलंगुट बीच निवडला आणि तो पूर्ण दिवस आम्ही बीचवर होतो. तिथेच दुपारचे जेवण उरकले आणि पुन्हा सनसेट होईपर्यंत बीचवर थांबलो. संध्याकाळी बिचवर थांबणे तितकेसे सुरक्षित नसते याची मला जाणीव होती त्यामुळे तिथून लवकर निघायचे होते अशातच अपेक्षित प्रमाणे एक भामटा आमच्या जवळ आला आणि कमी दरात डिस्कोपब मध्ये प्रवेश देतो म्हणून पैसे मागू लागला पण मी पैसे देण्यास साफ नकार दिला. आधी प्रवेश आणि मग पैसे असा मी पवित्रा घेतला शेवटी त्याने डिस्को प्रवेशाची खरी रक्कम सांगितली आणि डिस्कोच्या स्वागतकशातून आपले कामिशन घेऊन पळ काढला. डिस्को मध्ये रात्री २ वाजेपर्यंत एन्जोय केला आणि हॉटेलवर गेलो.
दुसऱ्या दिवशी आम्ही चर्च, मंगेशी मंदिर पाहण्यासाठी राखीव ठेवला होता आणि त्या दिवशी संध्याकाळी आम्हाला आमचा न पिणारा मित्र अरविंद याला निरोप द्यायचा होता त्याप्रमाणे त्याला वास्को येथील रेल्वे स्टेशनवर सोडायच होत. चर्च आणि मंदिर पाहून झाल्यावर पुन्हा बिअरप्राशन कार्यक्रम सुरु केला आणि दुपारच्या दरम्यान वास्कोकडे कूच केली वास्को मार्गावर बरीच वाहने चालू होती आणि ती ही चांगल्याच वेगात होती, अशातच एका मध्य रस्त्यात आम्हाला पोलिसांनी थांबवले मी आणि अमर थांबलो पोलिस आणि फौजदार आम्हाला लायसेन्स? कोठून आला? आणि कोठे चालला आहात? इत्यादी प्रश्न विचारात होते इतक्यात आमच्या मागून येणारे आमचे परममित्र अरविंद यांना आपली सुसाट वेगाने येणारी एक्टीवा आवरली नाही आणि सरळ फौजदार साहेबांच्या पायावर गाडी चढवली. आणि आमचा मित्र अमर हसू लागला त्यामुळे रागवलेल्या साहेबांनी दंडाची रक्कम तिप्पट केली. शेवटी ५०० रुपये दंड भरला तेही आमच्याजवळ लायसेन्स असताना वाहतुकीचे नियम मोडलेले नसताना. बिनपावतीचा दंड भरून आम्ही वास्को येथील एका साध्या हॉटेलात जेवण केल त्यावेळी मिळालेलं जेवणगोव्यातील आतापर्यंतच सर्वात चांगलं अस वाटलं. कोकणी रस्सा, सोलकढी, ओला फ्राय झिंगा आणि सोबतीला थंड बिअर मस्तच ! जेवण करून अरविंदला रेल्वेने पुण्यासाठी रवाना केले,परतल्यावर त्या रात्री पणजी जवळ क्रुझवर गोव्याच्या पारंपारिक नृत्याचा कार्यक्रम' पहिला आणि पहाटेपर्यंत बाईकवरून भटकत राहिलो.
अरविंद पुण्याला सुखरूप पोहचला होता. आम्ही आता तिघेजण उरले होतो त्यामुळे मला 'दिल चाहता है' सिनेमातले गोव्याला गेलेले तीन मित्र आठवले. त्यातला एक इतर दोघांना उद्देशून म्हणतो कि आपल्याला दरवर्षी एकदा तरी गोव्याला आल पाहिजे तेव्हा दुसरा म्हणतो ' वर्षातून एकदा तर दूर राहिलं पण दहा वर्षातून आपलं एकमेकांशी बोलण होईल कि नाही माहित नाही'त्यावर तिसरा आत्मविश्वासाने उतरतो ' आपण भेटू निश्चित भेटू . आणि ते पुन्हा भेटतात सुद्धा,आमच्याबाबतीत आम्ही अस काही ठरवलं नव्हत. चौथ्या दिवशी वोल्वो बसने आम्ही मुंबईला परतलो. पण जी धमाल गोव्यामध्ये आम्ही केली होती ती न विसरण्यासारखी होती. आज चार वर्षानंतर आम्ही चार जण चार दिशेच्या वेगवेगळ्या शहरात आहोत आमचं बोलण फोनवरून आता सोशल नेटवर्किंगवर आलं आहे. हा काळाचा महिमा आहे पण त्या आठवनी आणि अनुभव आम्ही घेऊन परतलो होतो आणि त्या अधून मधून जाग्या होतात अगदी जशाच्या तशा.
संदर्भ: मी मराठी माझी मराठी साठी लीहा. (Responses)
लेखक :हेमदीप
hhpatil@gmail.com
http://hempatil.blogspot.in/p/blog-page_4.html
hhpatil@gmail.com
http://hempatil.blogspot.in/p/blog-page_4.html