
पट्टागड ऊर्फ विश्रामगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. हा गड नगर-नाशिक जिल्ह्य़ांच्या हद्दीवर असणार्या अकोले तालुक्यातील ’पट्ट्याची वाडी’जवळ आहे.
इतिहास
बांधकाम
या किल्ल्याचे बांधकाम बहामनी सल्तनतच्या काळात(इ.स. १३४७]]-इ.स. १४९०) झाले. त्यानंतर याचा ताबा येथील स्थानिक रहिवासी आदिवासी कोळी महादेव जमातीकडे गेला त्यानंतर त्याचा ताबा अहमदनगरच्या निजामशाहीकडे गेला. इ.स. १६२७मध्ये मुगलांनी किल्ला जिंकला.
शिवाजी महाराजांचा काळ
इ.स. १६७१मध्ये पट्टा हा किल्ला मोरो त्र्यंबक पिंगळे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांकरिता जिंकला व स्वराज्यात सामील झाला. इ.स. १६७९ मध्ये आपल्या दक्षिण मोहिमेच्या अंतिम टप्प्यात महाराजांनी जालन्याची (तेव्हाचे जालनापूर) लूट केली. सोनेनाणे, जडजवाहीर घेऊन महाराज रायगडाकडे निघाले. दरम्यान, महाराज सोनेनाणे घेऊन रायगडाकडे जात असल्याची खबर मुघल सरदार रणमस्तखानाला लागली. दहा हजारांची मोठी फौज घेऊन तो महाराजांच्या मागावर निघाला. संगमनेरजवळच्या रायतेवाडी येथे दोन्ही सैन्याची गाठ पडली. दि. १८, १९ व २० नोव्हेंबर असे ३ दिवस दोन्ही सैन्यात तुंबळ युद्ध झाले. खानाच्या दिमतीला औरंगाबादेहून मोठी कुमक रवाना झाल्याची खबर आली. युद्ध सुरू असतानाच महाराजांनी खजिना घेऊन पुढे जायचे व बाकीच्या सैन्याने लढाई सुरू ठेवायची, अशी रणनीती निश्चित करण्यात आली. निवडक ५०० घोडेस्वारांसह महाराज पट्टा किल्ल्याकडे रवाना झाले. संगमनेरजवळ रायतेवाडी येथे आपल्या आयुष्यातील शेवटची लढाई लढून शिवाजीमहाराज २१ नोव्हेंबर इ.स. १६७९ या दिवशी नगर-नाशिक जिल्ह्यांच्या हद्दीवर असणार्या अकोले तालुक्यातील पट्टा किल्ल्यावर आले. त्यांचे वास्तव्य १७ दिवस या किल्ल्यावर होते. ते विश्रांतीसाठी थांबले म्हणून या किल्ल्याचे नामांतर नंतर ‘विश्रामगड’ असे पडले. विश्रांती घेऊन ते पुढे कल्याणमार्गेरायगडावर पोहोचले.